मुंबई व्यापारी केंद्र होण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक महत्त्वाचे कारण होते.

शीर्षक वाचून बरेच जण थोडे बुचकाळ्यात पडले असतील की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे मुंबई व्यापारी केंद्र बनलं असेल का? जाणून घेऊयात याचा संदर्भ आपल्या शिवचरित्रात काही मिळतो का? त्या आधी कोणतं शहर व्यापारी दृष्टीने महत्वाचं होतं आणि का ते सर्व प्रथम जाणून घेऊयात.

हिंदुस्थान च्या पश्चिम किनारपट्टीजवळ असलेलं सुरत शहर त्याकाळी मुघलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे शहर होते. हज ला जाणारे यात्रे करू याच शहरातून जात येत असे म्हणून, मुघली अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष या शहरावर होते. यात्रेकरूंच्या वर्दळीमुळे सुरत व्यापारी शहर म्हणून नावारूपाला येत होतं.

त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या पश्चिमेकडील कारभार आणि दळणवळण सूरतवरूनच होत असे. हिंदुस्थानात व्यापारासाठी पश्चिमेकडून उतरण्यासाठी बंदर सुरत जवळ असलेल्या फक्त इंग्रज च नव्हे तर डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि अन्य व्यापारीही येथे बस्तान मांडून होते.

१६६३ च्या दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्याला वेढलं होतं आणि त्याने पुण्याची प्रचंड लूट केली. दोन वर्षे शाहिस्तेखाना ने अजगरासारखा विळखा घातलेला असल्या कारणाने स्वराज्याच प्रचंड नुकसान होत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाला चांगलीच अद्दल घडवली.

मुघलांमुळे झालेलं स्वराज्याचं नुकसान भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचंच व्यापारी शहरावर च जानेवारी १६६४ मध्ये छापा घातला. आपल्या विश्वासू ४ हजार निवडक घोडेस्वार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला धडक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे सुरतचा सुभेदार इनायतखान चक्क शहर सोडून किल्ल्यात लपून बसला. याचा फायदा घेत मराठ्यांनी सुरत ची अक्षरशः वाताहत केली.

सुरत हुन खजिना घेऊन येत असताना इंग्रजांनी मराठ्यांना उगीच त्रास देण्यासाठी अडवणूक केली. मराठ्यांनी इंग्रजांच्या कोणत्याही व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यात वाद निर्माण झाला.

केवळ अडवणूक करण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या खोटेपणामुळे चिडलेल्या शिवरायांनी इंग्रजांकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. परंतु इंग्रजांकडून नकार आल्याने आणि पाठीवर येणाऱ्या मुघल सैन्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाद न घालता स्वराज्यात येणं जास्त संयुक्तिक वाटलं.

यानंतर १६७०च्या ऑक्टोबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा सुरत वर छापा टाकला. यावेळी मात्र मराठ्यांनी सुरत च कंबरडे मोडून काढले. वर पुन्हा तेथील व्यापाऱ्यांना भविष्यात खंडणी देण्यासाठी दम भरला. दोन्ही हल्ल्यामुळे आता  सूरतमध्ये वारंवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने पुन्हा हल्ला केला अश्या अफवा उठू लागल्या.

सतत च्या अश्या अफवांमुळे त्यामुळे दहशत पसरून लोकांनी धांदल उडत असे. या साऱ्याचा परिणाम येथील व्यापारावर होऊ लागला. त्यामुळे ब्रिटिशांना आणि तेथील व्यापाऱ्यांना नवीन बंदराचा शोध घेणे क्रम प्राप्त झालं.

१६६१ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला पोर्तुगीजांकडून मिळालेल्या मुंबई बेटावर ब्रिटिशांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. मात्र येथील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि अन्य अनेक कारणांमुळे मुंबईच्या विकासाकडे ब्रिटिशांनी विशेष लक्ष दिलेलं नव्हतं. आयत्या आंदण मिळालेल्या मुंबईकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

आता मुंबई शहर नवे व्यापारी शहर म्हणून नावारूपाला येत होतं. छत्रपती शिवरायांच्या सूरत स्वारी हे मुंबईच्या उभारणीचे एकमेव कारण आहे असं ठाम पणे कोणी इतिहासकार सांगत नाही. परंतु छत्रपती शिवरायांच्या मोठ्या दोन छाप्याने मुघलाच्या प्रमुख व्यापारी केंद्राला ग्रहण लागलं आणि व्यापाराचा केंद्रबिंदू मुंबईकडे सरकला, असा तर्क निश्चितच करू शकतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page