स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी न करता पुन्हा नव्याने बांधून घेतला.
समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे अंदाजे २७०० फूट उंचीवर रायगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मराठा साम्राजाच्या इतिहासामध्ये रायगडाची एक खास ओळख आहे.
छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि भौगोलिक महत्त्व पाहून १७व्या शतकात स्वराज्याची राजधानी बनविली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायर्या आहेत. इंग्रजांनी गड काबीज केल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.
रायगडाचा इतिहास सांगायचा झाला तर पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. स्थानिक लोक त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी नावाने ओळखत असे. पुढे जाऊन त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यापुरता व्हायचा.
जावळ खोऱ्यातील मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला होता. मोरे येण्यापूर्वी हा डोंगर शिर्क्यांकडे होता कदाचित शिर्क्यांपैकी कोणीतरी शिरकाई देवीची स्थापना गडावर केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. रायरी चा डोंगर पाहून याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडचा पूर्ण परिसर राजधानी बनवण्यास सोयीचा व मुबलक पुरेसा आहे. रायगडाचा भौगोलिक प्रदेशामुळे रायगड चढाईस आणि हल्ला करण्यासाठी अधिक अवघड ठिकाण आहे.
रायगडापासून समुद्र किनारा देखील जवळ असल्याने आरमारासाठी आणि सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली असावी.याच दुर्गदुर्गेश्र्वर रायगडास विविध नावांनी ओळखले गेले आहे. नंदादीप, रायरी, रायगड, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, इस्लामगड आणि पूर्वेकडील जिब्राल्टर.
आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात “पुर्वेकडील जिब्राल्टर” म्हणून इंग्रजांनी ज्याची स्तुती केली, युरोपियन मुख्यतः इंग्रज म्हणतात की, रायगडाची अभेद्यता इतकी मजबूत आहे की, जिब्राल्टरच्या रॉकशी त्याची तुलना व्हावी. रायगडावर अनेक इंग्रजी वकील येऊन गेले, स्टॉमस निकल्स, हेन्री अॉक्झीन्डन, स्टॉमस निकल्स हा सर्वांनी कमी अधिक प्रमाणात असेच वर्णन केले आहे.
स्टॉमस निकल्स हे एका पत्रात म्हणतात की, शिवाजी महाराजांनी रायगड घेतल्याच्या नंतर त्यावर एक मुख्य तटबंधी बांधली, त्यानंतर त्याच्या आत एक तटबंधी बांधून किल्ला इतका मजबूत केला आहे की, जर गडावर पुरेसा अन्नसाठा असेल तर रायगड संपुर्ण जगाविरुद्ध लढू शकेल.
बांधकाम, तंत्रज्ञान, स्थापत्य कौशल्य सर्व शिवराय आणि हिरोजी इंदुलकर यांचं, किल्ला महाराष्ट्रातील व त्याच कौतुक इंग्रज लोक करतात म्हणजे हि काही सोपी गोष्ट नक्कीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तो पर्यंत कोणाचीही गडावर हल्ला करण्याची किंवा अवैधरित्या चढाई करण्याचे प्रयत्न केले नाही. चढाई करण्याचे मार्ग शक्य होते त्यांना देखील तासून ते मार्ग अभेद्य केले.
स्पेनच्या दक्षिणेकडच्या टोकावर भूमध्य समुद्राच्या आणि जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या तोंडाशी असलेला हा भाग स्पेन या देशाचाच एक तुकडा आहे. पण त्याची मालकी मात्र ब्रिटिशांकडे होती. वास्तविक ६.७ चौरस कि. मी. आकाराचा स्पेनचा हा दक्षिणेकडचा तुकडा; परंतु अत्यंत महत्त्वाच्या, मोक्याच्या जागी.
भूमध्य समुद्राच्या तोंडाशी १३ कि. मी. रुंदीची सामुद्रधुनी असलेला हा प्रदेश येथून अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या सुवेझ कालव्याकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर पहारा ठेवता येऊ शकतो. बऱ्याच वर्षा पर्यंत हा जिब्राल्टर चा खडक अभ्येद्य राहिला. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम.