छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा सहज पाडाव करता येईल. अश्या केविलवाणी समजून घेऊन औरंगजेब स्वराज्यात आला. दक्षिणेकडे मुघल साम्राज्य पोहोचावं या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्रावर चाल करण्यास पाठवलं.
स्वराज्यातील किल्ल्यांची माहिती काढून त्याने त्यामानाने सोपा आणि पटकन जिंकता येईल असा किल्ला निवडला. त्याने योजना अशी आखली की रामशेज किल्ल्यावर मुघली परचम चाँदसितारा फडकवुन किल्ल्याजवळच्या आसपासच्या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करता येईल असा मनसुबा घेऊन तो स्वराज्यात आला.
औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदारांना त्यासंदर्भात माहिती दिली. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे नाव स्पष्ट पणे सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, प्रामुख्याने एक नाव समोर येत ते म्हणजे सूर्याजी जेधे.
छत्रपती शिवरायांच्या नंतर स्वराज्यावर होणारं हे पहिलं आक्रमक होतं त्यामुळे औरंगजेबाला कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती. औरंगजेबाने शहाबुद्दीन सोबत दहा हजारांची फौज आवश्यक ते हुन अधिक दारूगोळा आणि तोफा पाठवल्या होत्या. त्यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते.
मावळातील धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी हरहुन्नरी मावळे किल्लेदारासाठी आणि स्वराज्यासाठी जीव देणारे. सूर्याजी जेधे रामशेजच्या तटावरून दिवस रात्र पहारा घालत असत. चार-पाच तासांत किल्ला ताबयात घेऊ या विचाराने निघालेला शहाबुद्दीन किल्ल्यावर नाना त-हेने हल्ला केला.
किल्ल्याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे(बहुमजली मचाण)तयार करून त्यावर तोफा चढवल्या. मात्र किल्ला आणि किल्ल्यावरील सैन्य त्याच्या ताब्यात येईना. त्यामानाने रामशेज वर बेताचा च दारुगोळा उपलब्ध होता पण किल्ल्यावर तोफा नव्हत्या. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि त्या तोफा घेऊन किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरू केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान पुरता गांगरून गेला.
बघता बघता पाच महिने झाले, शहाबुद्दीन ला किल्ला काही जिंकता येईना. कारण मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोचत नव्हते. तेव्हा शहाबुद्दीन ने किल्याच्या पायथ्याला जेवढी झाडं होती ती झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरूज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला. आणि तसं केलं देखील त्या लाकडी बुरुजावरून त्यावरून किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. दोन वर्षे झाली घनघोर युद्ध चालू होते मात्र तरी देखील रामशेज किल्ला अजिंक्य राहिला.
शहाबुद्दीन च्या मदतीला कोकलताश यांस पाठवले. रामशेजच्या मोहिमेवर येताना त्याला समजले की रामशेज वर भूत पिशाच आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मांत्रिकाची मदत घेऊन आपण किल्ला सहज जिंकू शकतो.
मांत्रिकाला घेऊन त्याने रामशेज वर हल्ला चढवला पण मराठयांनी त्याचा तो डाव देखील हाणून पाडला. आता या कथेत कितपत सत्य आहे ठाऊक नाही. पण दोनवर्ष निकराची लढाई देऊन देखील किल्ला हाती येत नाही म्हटल्यावर मुघलांनी मांत्रिकाला बोलवून घेत किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहाबुद्दीन खानापेक्षा जास्त ताकदीने कधी फतेहखान, कधी कासम खान रामशेजवर आक्रमण चढवले. तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सैनिक किल्ल्यावर आले, की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे.
उंचावरून दगड इतके जोरात सुटायचे, की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. मुघलांना मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात. इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला पण हट्टी आणि स्वाभिमानी मराठयांनी किल्ल्यावरची पकड जरा सुद्धा ढिली सोडली नाही.